क्षेत्र महाबळेश्वरच्या संजय कांबळेचा जम्मू-काश्मीरमध्ये 'सिंदूर महा रक्तदान' उपक्रमात सहभाग : गावकऱ्यांचा गौरव, देशभक्तीची भावना जागवणारा अभिमानाचा क्षण!
क्षेत्र महाबळेश्वरच्या संजय कांबळेचा जम्मू-काश्मीरमध्ये 'सिंदूर महा रक्तदान' उपक्रमात सहभाग : गावकऱ्यांचा गौरव, देशभक्तीची भावना जागवणारा अभिमानाचा क्षण!
देशाच्या स्वातंत्र्याला ७८ वर्षे पूर्ण होत असताना जम्मू-काश्मीरच्या पावन भूमीवर सांगली जिल्ह्यातील हजारो तरुणांनी रक्तदान करून एक नवा इतिहास घडवला आहे. या ऐतिहासिक क्षणात क्षेत्र महाबळेश्वर गावातील तरुण संजय बाळासो कांबळे यांनी सहभाग नोंदवून गावाचे नाव उज्ज्वल केले. त्यांच्या या कार्याबद्दल गावकऱ्यांनी त्यांचा सत्कार करून मनःपूर्वक गौरव केला.
'सिंदूर महाराष्ट्र केसरी' चंद्रहार पाटील यांच्या संकल्पनेतून आणि 'धर्मवीर एक्सप्रेस'च्या पुढाकारातून सांगलीतून तब्बल एक हजार तरुण जम्मू-काश्मीरमध्ये दाखल झाले. देशरक्षणासाठी झटणाऱ्या जवानांना रक्ताचा पुरवठा व्हावा, त्यांचे आरोग्य सुदृढ राहावे, यासाठी हे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः या उपक्रमात उपस्थित राहून तरुणांना प्रेरणा दिली. स्वातंत्र्यानंतर प्रथमच अशा पद्धतीने देशासाठी, सैनिकांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर रक्तदान झाले, ही नोंद इतिहासात कायम राहील.
या उपक्रमात संजय कांबळे यांच्या सहभागामुळे क्षेत्र महाबळेश्वरकरांच्या मनात एक विशेष अभिमान दाटला आहे. गावकऱ्यांनी त्यांचे कौतुक करताना म्हटले, "देशासाठी आपल्या गावातील युवकाने दिलेले रक्त म्हणजे क्षेत्र महाबळेश्वरच्या मातीतील देशभक्तीची खरी साक्ष आहे. संजयने केवळ रक्तदान केले नाही तर गावाचा मान उंचावला आहे."
सैनिकांच्या चेहऱ्यावर आनंद, स्थानिक काश्मिरी जनतेच्या मनात कृतज्ञता आणि महाराष्ट्राच्या तरुणाईत उफाळून येणारी देशभक्ती या सर्वांचा संगम या उपक्रमातून झाला. गावातील ज्येष्ठ मंडळींनीही सांगितले की, अशा कार्यामुळे नव्या पिढीतील तरुणांमध्ये राष्ट्रीय ऐक्य, त्याग आणि सेवा या मूल्यांची प्रेरणा मिळते.
संजय कांबळे यांच्या या योगदानामुळे क्षेत्र महाबळेश्वर गावात देशभक्तीची नवी ज्योत प्रज्वलित झाली आहे. गावातील तरुण मंडळींनीही "आम्हालाही अशाच उपक्रमांत सहभागी व्हायचं आहे" असा संकल्प केला.
देशासाठी ओतलेले रक्त कधीच व्यर्थ जात नाही, तर ते राष्ट्रीय एकतेची आणि शौर्याची साक्ष देते. क्षेत्र महाबळेश्वरच्या भूमीतून उभा राहिलेला हा अभिमानाचा क्षण पुढील पिढ्यांना नक्कीच प्रेरणा देणारा ठरेल.
Comments
Post a Comment