महाबळेश्वरात मुसळधार पाऊस; अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत
सातारा जिल्ह्यातील गिरिस्थान नगरी महाबळेश्वर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने कहर केला असून, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. आज, मंगळवारी (२० ऑगस्ट) महाबळेश्वर नगरपरिषदेकडून मिळालेल्या माहितीनुसार, २४ तासांत तब्बल ३०१ मिमी पाऊस झाला आहे. यामुळे यंदाच्या वर्षीचा एकूण पाऊस ४८६९.४० मिमी (१९१.७०९ इंच) इतका नोंदवला गेला आहे.
- महाबळेश्वर – ५४.२ मिमी
- पाचगणी – १४.० मिमी
- तापोळा – २६.१ मिमी
- लांबज – १९.० मिमी
यामुळे तालुक्याची सरासरी २८.३२ मिमी इतकी झाली आहे.
२० ऑगस्ट २०२४ रोजी फक्त ६.८० मिमी पाऊस झाला होता, तर त्या वेळेपर्यंतचा एकूण पाऊस ५००८.३० मिमी (१९७.१७७ इंच) इतका होता. तर, २०२४ मध्ये एकूण वार्षिक पर्जन्यमान ६६६८.५० मिमी (२६२.४६ इंच) इतके झाले होते. यंदा मात्र दिवसागणिक पावसाचा जोर वाढत असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनत आहे.
- अतिवृष्टीमुळे घाटमाथ्यावर दरडी कोसळण्याचा धोका वाढला आहे.
- मौजे भिलार येथील जिल्हा परिषदेची शाळा अतिधोकेदायक स्थितीत आहे.
- एकूण ५ घरांचे अंशतः नुकसान झाले असून छपरावरील पत्रे, भिंती व साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.
- ग्रामीण भागातील अनेक रस्ते आणि पूल वाहतुकीसाठी बंद पडले असून दुरुस्तीचे काम प्रशासनाने युद्धपातळीवर सुरू केले आहे.
- शेतजमिनीत पाणी साचल्याने पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
नागरिकांनी नदीकाठ, दरड कोसळण्याचा धोका असलेल्या ठिकाणी जाणे टाळावे. आवश्यक असल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. मदत व बचावकार्य सुरू असून, बाधित कुटुंबांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवले जात आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील २४ तास मुसळधार पावसाचा इशारा असून प्रशासन सतत निरीक्षण ठेवून आहे.
महाबळेश्वराला मिळालेली ‘रेन क्वीन’ ही उपाधी पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने सिद्ध होताना दिसत आहे. मात्र या अतिवृष्टीमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले आहे.
Comments
Post a Comment