राज ठाकरेंच्या टीकेवर शिंदेंचे प्रत्युत्तर; "पूर्ण माहिती घेऊनच बोलायला हवे होते"
प्रतापगड वार्ताहर:
मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा तापलेला आहे. आझाद मैदानावर मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. मात्र त्यावर आता शिंदेंनी थेट प्रत्युत्तर देत राज ठाकरेंनी ‘पूर्ण माहिती न घेता बोलणे योग्य नाही’, असा सल्ला दिला आहे.
सातारा येथे पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,
“राज ठाकरे यांनी आधी संपूर्ण माहिती घ्यायला हवी होती. मराठा समाजाला आम्ही १० टक्के आरक्षण दिले आहे. खरं तर आरक्षण का गेले, हा प्रश्न त्यांनी त्यावेळच्या सरकारला विचारायला हवा होता. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात हायकोर्टात हे आरक्षण आम्ही टिकवले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयात ते का टिकले नाही, याची उत्तरे तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी द्यायला हवी होती.”
तसेच शिंदे पुढे म्हणाले,
“मी हे बोलतोय ते काही लोकांना माहिती व्हावं म्हणूनच बोलतोय. आम्ही न्यायमूर्ती शिंदे समिती स्थापन करून अनेक पुरावे शोधले. १९६७ पूर्वीच्या असंख्य नोंदी काढल्या. ज्यांना अशा नोंदी मिळाल्या, त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले. त्यामुळे मराठा समाजालाही त्याचा प्रत्यक्ष लाभ झाला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच भाष्य करायला हवे होते.”
मुंबईत पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले होते,
“या सगळ्या प्रश्नांची उत्तरे एकनाथ शिंदेंनी द्यायला हवीत. तेच सांगू शकतात की मनोज जरांगे-पाटील आणि मराठा आंदोलकांना मुंबईत का यावे लागले. मुंबईकरांना आंदोलनामुळे त्रास होत असेल तर त्याचे उत्तरही शिंदेंनीच द्यायला हवे. कारण यापूर्वी ते नवी मुंबईत गेले आणि तिथला प्रश्न सोडवून आले, मग आता मुंबईत आंदोलन का? याचे उत्तर शिंदेंकडेच आहे.”
मनोज जरांगे-पाटील सध्या आझाद मैदानावर उपोषणावर आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी त्यांचा संघर्ष सुरू आहे. त्यामुळे राज्य सरकारवर प्रचंड दबाव वाढला आहे. या प्रश्नावरून राजकारणही चांगलेच पेटले असून विरोधक सरकारवर सतत टीका करत आहेत. त्यात आता राज ठाकरेंनी शिंदेंकडे बोट दाखवल्याने नवा वाद निर्माण झाला.
Comments
Post a Comment