“न्यायिकता व लोक सुरक्षा” या विषयावर ऍड. असीम सरोदे यांचे व्याख्यान
सातारा प्रतिनिधी (अनिल वीर ):
“न्यायिकता व लोक सुरक्षा” हा आजच्या समाजजीवनातील महत्त्वाचा व ज्वलंत विषय असून, संविधानाने नागरिकांना दिलेले अधिकार, न्यायाची हमी आणि लोकसुरक्षेचे तत्व हे लोकशाहीचे प्राण आहेत. याच विषयावर उच्च न्यायालय खंडपीठ कोल्हापूरचे वकील, संविधान विश्लेषक ऍड. असीम सरोदे यांनी सातारा येथे सखोल व्याख्यान दिले.
हा कार्यक्रम दैवज्ञ सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आला होता. सातारा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील लढाऊ नेतृत्व, कष्टकरी व श्रमिक वर्गासाठी आयुष्यभर संघर्ष केलेले स्मृतीशेष कॉ. व्ही. एन. पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त कॉ. व्ही. एन. पाटील स्मारक समितीच्या वतीने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ऍड. असीम सरोदे यांचा संविधानाची प्रत आणि पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.
हा सत्कार महालक्ष्मी फाऊंडेशनच्या संस्थापिका प्रतिभा सुनील शेलार, बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक व संविधान लोकजागर परिषदेचे संघटक अनिल वीर आणि सहकाऱ्यांनी केला.
या व्याख्यान कार्यक्रमाला कॉ. व्ही. एन. पाटील स्मारक समितीचे अध्यक्ष कॉ. अतुल दिघे, समितीचे संस्थापक, लोकशाही प्रेमी नागरिक, कामगार कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, कायदे विषयक अभ्यासक, संविधान अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यामध्ये कॉ. वसंतराव नलावडे, शंकर पाटील, प्रमोद परामणे, विजय निकम, अस्लम तडसरकर, शिरीष जंगम, दत्तात्रय राऊत, विजय मांडके, नारायण जावलीकर, जनार्धन घाडगे गुरुजी, हरिदास जाधव गुरुजी, प्रभाकर बनसोडे, डॉ. गोरख बनसोडे आदी मान्यवरांचा समावेश होता.
ऍड. सरोदे यांनी आपल्या व्याख्यानात स्पष्ट केले की –
- न्यायिक प्रक्रियेत सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास व सहभाग टिकून राहिला पाहिजे.
- लोक सुरक्षा ही फक्त कायद्याच्या अंमलबजावणीपुरती मर्यादित नसून ती सामाजिक न्याय, समानता आणि बंधुत्वाशी निगडित आहे.
- संविधानातील तरतुदींचा योग्य अभ्यास करून त्या प्रत्येकाच्या जीवनात प्रत्यक्ष उतरल्या, तरच लोकशाही मजबूत राहील.
त्यांच्या सखोल आणि तथ्याधिष्ठित मांडणीला उपस्थित मान्यवर व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कॉ. व्ही. एन. पाटील हे १९५२ ते १९६२ दरम्यान सातारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील त्यांचे लढाऊ नेतृत्व आजही स्मरणात आहे. कष्टकरी व शेतकरी वर्गाच्या हक्कांसाठी त्यांनी आजीवन संघर्ष केला. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी सामाजिक, शैक्षणिक आणि विचारप्रवर्तक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
या कार्यक्रमातून सातारा जिल्ह्यातील विचारप्रवण नागरिकांचा मोठा सहभाग दिसून आला. समाजातील तळागाळापर्यंत संविधानाचे महत्त्व पोहोचावे, न्यायव्यवस्था बळकट व्हावी आणि लोकसुरक्षा अबाधित राहावी यासाठी अशा कार्यक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
Comments
Post a Comment