पावसाचा जोर ओसरल्याने जनजीवन पूर्वपदावर
सातारा प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले होते. नद्यांना पूर, रस्त्यांवर पाणी, वाहतूक विस्कळीत आणि गावोगावी स्थलांतर अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र आता पावसाचा जोर ओसरल्याने हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे.
प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अतिवृष्टीमुळे महाबळेश्वर, कोयना, जावळी, पाटण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. धरणांतून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सोडावा लागल्याने नदीकाठच्या गावांमध्ये भीतीचं वातावरण होतं. काही ठिकाणी रस्ते वाहून गेले, पूलांवर पाणी आलं. शाळांना दोन दिवस सुट्या द्याव्या लागल्या.
दरम्यान, गेल्या २४ तासांपासून पावसाची तीव्रता कमी झाल्याने रस्त्यांवरील पाणी ओसरले आहे. वाहतूक पुन्हा सुरू झाली असून वीजपुरवठा खंडित झालेल्या ठिकाणी दुरुस्तीचं काम सुरू आहे. पूरग्रस्त गावांमध्ये तातडीने मदत पोहोचवली जात असून स्थलांतरित कुटुंबांना त्यांच्या घरी परतण्यास मदत केली जात आहे.
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना अनावश्यक अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहण्याचं प्रशासनाने आवाहन केलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून विस्कळीत झालेलं जीवन आता हळूहळू रुळावर येत आहे. शेतकरी पेरणी व शेतीकामाकडे वळले असून बाजारपेठांनाही चैतन्य परतलं आहे.
Comments
Post a Comment