धोम धरण विसर्गामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ; वाईतील मंदिरे पाण्यात
वाई/प्रतिनिधी –
महाबळेश्वर परिसरात व सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा झाला आहे. परिणामी 20 ऑगस्ट रोजी धोम धरणातून विसर्ग वाढविण्यात आला. या विसर्गामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत जलद गतीने वाढ झाली असून, वाई शहराजवळील अनेक घाट परिसर पाण्याखाली गेले आहेत.
विशेष म्हणजे, कृष्णा घाटासह वाईतील काही प्राचीन मंदिरे आणि घाटावरील बांधकामे पाण्याखाली गेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नदीकाठावर येणाऱ्या भाविक आणि नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
तत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन वाई नगरपरिषद तसेच महसूल व पोलिस प्रशासनाने नदीकाठच्या भागात जाण्यास बंदी घातली असून, बॅरिकेट्स लावून वाहतूक व हालचालींवर नियंत्रण ठेवले आहे. आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत.
साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी माहिती देताना सांगितले की, "धरण क्षेत्रात सतत येणाऱ्या पावसामुळे विसर्ग सुरू ठेवणे भाग आहे. नागरिकांनी अफवा पसरवू नये व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. नदीकाठच्या गावांनी विशेष दक्षता घ्यावी."
दरम्यान, नदीच्या काठावर असलेल्या काही शेतजमिनींमध्ये पाणी शिरले आहे. पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. वाईतील धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा असलेली मंदिरे पाण्यात गेल्याने स्थानिक नागरिक व भाविकांत नाराजीचे वातावरण आहे, मात्र परिस्थितीवर नियंत्रण असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Comments
Post a Comment