अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत – राजेंद्र शेठ राजपुरे
महाबळेश्वर प्रतिनिधी–
महाबळेश्वर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतजमिनी, रस्ते, घरे, शैक्षणिक संस्था आणि इतर पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेषतः भोसे येथील प्राथमिक शाळेची इमारत कोसळल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी महाबळेश्वर तहसीलदार सचिन मस्के, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय विभुते यांच्यासह प्रशासनातील अन्य अधिकारी भोसे गावात दाखल झाले. या पाहणी दरम्यान सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नेते राजेंद्र शेठ राजपुरे यांनी प्रशासनाला स्पष्टपणे सांगितले की, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्यात यावेत.
त्यांनी नमूद केले की, शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच, अनेक ठिकाणी रस्ते वाहतुकीसाठी बंद पडले आहेत. अशा परिस्थितीत तातडीने पंचनामे करून मदतीची कार्यवाही सुरू न झाल्यास सामान्य जनतेवर आर्थिक आणि मानसिक संकट आणखी गडद होईल.
राजपुरे यांनी पुढे सांगितले की, तालुक्यातील पुनर्वसन आणि मदतकार्याबाबत ते राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्याशी चर्चा करणार असून, तालुक्याच्या हितासाठी आवश्यक ती मदत मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल.
अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी झालेल्या नुकसानीची पाहणी करून प्रशासनाच्या वतीने पंचनामे तातडीने करण्यात येतील असे आश्वासन दिले.
गेल्या काही दिवसांतील सततच्या पावसामुळे महाबळेश्वर तालुक्यातील परिस्थिती गंभीर झाली असून, प्रशासन, जनप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मिळून एकत्रितपणे मदतकार्य पुढे नेण्याची गरज असल्याचे स्थानिक नागरिकांचे मत आहे.
Comments
Post a Comment