पोलादपूरमधील कापडे–कामथे रस्त्याची दुरावस्था; गणपतीपूर्वी काम होणार का?
प्रकाश कदम, पोलादपूर प्रतिनिधी
पोलादपूर – तालुक्यातील कापडे–कामठे हा महत्त्वाचा रस्ता गेल्या काही महिन्यांपासून अत्यंत दयनीय अवस्थेत असून मोठमोठे खड्डे, तुटलेले डांबर व साईट पट्टीचा अभाव या परिस्थिती यामुळे ग्रामस्थ व वाहनचालक त्रस्त झाले आहेत. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चाकरमानी गावाकडे येताना या रस्त्याची दुरावस्था पाहून नाक मुरडणार यात शंका नाही, अशी चिंता स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका
सध्या या रस्त्यावरून , कापडे, कामथे मार्गावर सावित्री ढवळी कामथी विभागाच्या आजूबाजूच्या गावे जोडली जातात. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दोनचाकी वाहनचालकांना सतत अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. मुसळधार पावसात रस्ता चिखलमय झाल्याने वाहने घसरून अपघात झाल्याची उदाहरणे समोर आली आहेत. विशेषतः शालेय विद्यार्थ्यांची व शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.
नागरिकांचा संताप
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षभरापासून या रस्त्याचे काम वारंवार मंजूर झाल्याच्या बातम्या येत आहेत; परंतु प्रत्यक्षात कोणतीही कामे सुरू झालेली नाहीत. “गणपती उत्सवाच्या काळात मुंबई–पुणे–कोकणातून हजारो चाकरमानी गावाला येतात. त्यांना या रस्त्याने प्रवास करावा लागतो आणि पहिल्याच दिवशी दुरवस्थेचे दर्शन घडते. प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे,” अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
अधिकाऱ्यांना प्रश्न
नागरिकांचा सरळ सवाल आहे की – “गणपतीपूर्वी या रस्त्याचे काम पूर्ण होणार का?”
लोकप्रतिनिधी आणि संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी होत आहे. “फक्त तात्पुरत्या दुरुस्त्यांवर वेळ मारून नेण्याऐवजी दर्जेदार व कायमस्वरूपी काम झाले पाहिजे,” असा सूर ग्रामस्थांच्या संतापातून उमटतो.
प्रशासनाची भूमिका?
याबाबत अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नसली तरी रस्त्याची दुरुस्ती तातडीने सुरू होईल, अशी आश्वासने स्थानिक पातळीवर दिली जात आहेत. मात्र प्रत्यक्षात काम कधी होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---
पोलादपूरमधील कापडे–कामथे रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिकांचा संताप दिवसेंदिवस वाढत असून, गणेशोत्सवापूर्वी काम हाती न घेतल्यास प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
--
Comments
Post a Comment